नवी मुंबईतील रस्ते चकाचक, 'मॅनहोल' बनले मृत्यूचे सापळे!
| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक मंचाचा संताप नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, ही कामे करताना अभियांत्रिकी निकषांना हरताळ फासला जात असल्याचे चित्र समोर येत आहे. महपालिकेच्या या कारभाराबाबत सजग नागरिक मंच नवी मुंबईतर्फे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सीबीडी बेलापूरमधील कॉ. भाऊ पाटील चौक ते आग्रोळी रेल्वे ब्रिज या दरम्यान २५ मार्च रोजी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, तीन आठवडे उलटूनही या रस्त्यावरील मॅनहोल्स रस्त्याच्या समपातळीत आणले नसल्याने दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे मॅनहोलची झाकणे रस्त्यापेक्षा खोल गेली आहेत. वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराला या खड्डयांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे गंभीर अपघात घडू शकतात. हा प्रकार अपघाताला निमंत्रण देणारा देणारा ठरू शकतो कारण अचानक समोर खड्डा दिसल्याने चारचाकी वाहन चालक लेन बदलण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता अधिक असते. याच ठिकाणी पाईप टाकण्यासाठी फुटपाथवर ठेवलेले पाईप काम पूर्ण होऊन देखील आयटीआय समोरील फुटपाथवर अद्याप तिथेच पडून आहेत. यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचे सजग नागरिक मंचचे म्हणणे आहे. शहर अभियंता विभागात कनिष्ठ अभियंत्यापासून ते शहर अभियंत्यापर्यंत अधिकाऱ्यांची मोठी फौज असतानाही, कोणाचेही लक्ष अशा गंभीर बाबीकडे का जात नाही हा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे आहे. हा प्रकार केवळ अपवाद नसून नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी असेच प्रकार घडत असल्याने शहर अभियंता विभागामार्फत कामे सुरू असताना संबंधित अभियंते प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी येत नसल्यानेच अशा गोष्टीकडे दुर्लक्ष होते आहे असे आरोप नागरिक करत आहेत. पालिकेला नागरिकांनी केलेल्या तक्रारी आवडत नसल्याचा अनुभव नागरिकांना वारंवार येतो. यावरील सर्वोत्तम उपाय म्हणजे पालिकेने नवी मुंबईतील सर्व कामे नियमानुसार आणि घटनात्मक उत्तरदायित्व पाळून करावीत, जेणेकरून नागरिकांना तक्रार करण्याची संधीच उरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
